द्वापार युग संपलं आणि कलियुगाला सुरुवात होऊन काही वर्षं झाली होती. निषाद राजा विश्ववसू याचा जन्म सबर कुळात झाला. तो उत्कल राज्यात एका आदिवासी कबिल्याचा सरदार होता. एके दिवशी जंगलात शिकार करायला निघालेला विश्ववसू रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याची पत्नी, मुलगी आणि समुहातील इतर सदस्य काही अनुचित गोष्टींच्या भीतीने थरथर कापू लागले. बरेच दिवस आदिवासी सैनिकांनी विश्ववसूच्या शोधात रात्रीचा दिवस केला, पण त्यांना त्यांच्या राजाचा ठावठिकाणा कुठेही सापडला नाही. त्यामुळे थकून भागून प्रत्येकजण विश्वावसूच्या आरोग्यासाठी दु:खी मनाने प्रार्थना करू लागला.
जंगलातल्या एका अस्वलाचा पाठलाग करता करता विश्वावसू रस्ता चुकला. खरंतर तो अनेकदा या जंगलात शिकार करण्यासाठी येत असे, पण आज मात्र त्याला जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. कदाचित एखादी मायावी शक्ती त्याला या जंगलातून बाहेर पडू देत नसावी. शेवटी, बर्याच प्रयत्नांनंतर तो थकून एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. थोड्या वेळाने, त्याच झाडापासून थोड्या अंतरावर असलेल्या गुहेतून चमकणाऱ्या एका वस्तूने त्याचं लक्ष वेधून घेतलं. कुतूहल वाटल्यामुळे विश्वावसू गुहेतून येणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला. तो जेवढा गुहेजवळ जात होता, तेवढा गुहेमधून येणारा प्रकाश अधिक तेजस्वी होऊ लागला. अशाप्रकारे त्या प्रकाशाचा मागोवा घेत घेत अखेर त्याने गुहेत प्रवेश केला.
गुहेत प्रवेश करताच विश्ववसुला मन शांत वाटू लागलं. त्या गुहेत अद्भुत शांतता होती. का कोण जाणे पण थोड्या वेळापूर्वी या जंगलातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या निशादराजाला आता या गुहेत कायमचं राहावं असं वाटू लागलं. तरीही उत्सुकतेने त्याने गुहेतून जिथून प्रकाश येत होता त्याच दिशेने गुहेच्या आणखी आत प्रवेश केला.
अत्यंत तेजस्वी अशा त्या प्रकाशाजवळ पोहोचल्यावर जणू त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे; जणू काही त्याने प्रेत पाहिलं असावे अशा भीतीने तो थरथर कापू लागला. डोळ्यांसमोर जे घडत होतं, ते सर्व खरं कसं असेल? एखादी मूर्ती जिवंत कशी होईल? असं त्याला वाटू लागलं
(पुतळा निळा असावा, या प्रतिमेमध्ये फुलांची माला नाही, पुतळ्याभोवती निळं तेज आहे.)
"मला हा भास होतोय की एखाद्या दुष्ट राक्षसाची माया?” भीतीमुळे घामाने डबडबलेला विश्ववसू स्वतःलाच प्रश्न विचारत होता; कारण त्याच्या डोळ्यांसमोर जे काही घडत होतं, त्याच्यावर विश्वास ठेवणं त्यालाही अशक्य होतं.
विश्वावसुसमोर एक गडद निळी मूर्ती होती, ज्यामधून सतत तेजस्वी प्रकाश येत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मूर्तीचे डोळे उघडलेले होते आणि कोणत्याही जिवंत मनुष्यासारख्या डोळ्यांच्या बाहुल्याही हलत होत्या. ती मूर्तीही विश्वावसुला पाहिल्यानंतर स्मित हास्य करत होती. जर तो एखादा सामान्य मनुष्य असता तर हे सर्व पाहून त्याने घाबरून आपला जीव गमावला असता. परंतु निषाद राजा धीर न सोडता आणि सर्व धैर्य एकवटून मूर्तीकडे पाहत होता.
विश्वावसुने त्या मायावी मूर्तीला विचारलं, "तू कोण आहेस? तुला काय हवं आहे? तू मला तुझ्या मायेच्या पाशात का ओढत आहेस?”
ती मूर्ती त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता केवळ स्मितहास्य करत होती. हे पाहून विश्ववसू घाबरत होता.
विश्ववसूने भीतीपोटी आवंढा गिळत दबक्या आवाजात पुन्हा त्या मूर्तीला विचारलं, "मला माहित आहे तूच मला इथे आणलंस. आता जर आणलंच आहेस तर तू माझ्याकडून तुला काय हवं आहे ते तू मला का सांगत नाहीस? जर तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे आणि मला संपव. तू उगाचच का हसतो आहेस?"
मूर्तिने मोठ्या चातुर्याने उत्तर दिलं, "हा हा हा ...सबर राजा इतक्या लवकर मला विसरलास? मी अनेक युगं तुझ्याबरोबरच आहे."
आश्चर्यचकित विश्ववसूने विचारलं, "मला काही समजलं नाही, तू आणि माझ्याबरोबर?"
"हे निषाद राजा आता तुला मी आठवण करून देतो.” मूर्तीने असं म्हणताच त्या गुहेत वेद मंत्रोच्चारांचा आवाज घुमू लागला. संपूर्ण वातावरणात तुळस आणि चंदनाचा सुगंध येऊ लागला. विश्ववसूला असं वाटू लागलं की आपण जणू काही एका हवनकुंडाजवळ उभे आहोत. हळू हळू त्याला एक विलक्षण चेतना जाणवू लागली आणि रामायण आणि महाभारत काळातल्या घटना त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या.
आता मनात शंका नव्हती. विश्ववसुच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. इतक्या वर्षानंतर, भगवंतांना स्वतःसमोर पाहून सबरराजाला अतिशय आनंद झाला. त्रेता युगातील वाली, द्वापारयुगातील जारा आणि आता कलियुगात विश्वावसु असलेल्या या महान विष्णूभक्तासमोर, त्यांचं आराध्यदैवत श्रीहरि स्वत: निलमाधव यांच्या मूर्तीरूपात उभं होती.
"हे भगवंता, माझं भाग्य थोर म्हणून मला या जीवनात पुन्हा एकदा आपल्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केशवा, मी धन्य झालो आहे." विश्वावसु निलमाधवांच्याकडे पाहात म्हणाला.
"हे जारा, द्वापार युगात जेव्हा तू मला बाण मारून माझ्या नश्वर शरीरापासून मुक्त केलंस, तेव्हा मी तुला म्हटलं होतं की, यानंतर येणाऱ्या युगात तू माझा प्रमुख सेवक होशील. आता ती वेळ आली आहे. या नीलकंदर गुहेत मी नीलमाधव यांच्या रुपात अवतार घेतला आहे. हे विश्वावसु, कलियुगात जेव्हा अधर्म अंतिम टप्प्यावर पोहोचेल, तेव्हा मी कल्की अवतार घेईन. तोपर्यंत माझं हे माधवरूप कलीयुगातील सर्व प्राणीमात्रांसाठी पूजनीय असेल." असं म्हणत भगवान निलमाधव यांनी विश्वावसुला त्यांच्या पृथ्वीवरील अवताराचा हेतू समाजावून सांगितला.
"परमेश्वरा, मी आपला सेवक आहे, आपल्या इच्छेनुसार सारं काही होईल." असं सांगून विश्वावसु निलमाधवाच्या सेवेत मग्न झाला. त्यादरम्यान, बरेच दिवस गेले होते आणि विश्ववसूच्या कुटुंबीयांनी त्याच्या जिवंत असण्याची आशा सोडली होती. त्याच्या आदिवासी समूहाचा एक नवीन सरदार निवडला गेला . भगवान निलमाधव यांनी या सर्व गोष्टींची माहिती विश्वावसुला दिली; आणि त्यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबाचे किती हाल होत आहेत हेही सांगितलं.. विश्वावसुला भगवान निलमाधव यांनी तो राजा आणि वडील या नात्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवूनच तो ईश्वराची खरी सेवा करू शकेल असं सांगून गुहा सोडण्याची आज्ञा दिली.. निघताना त्यांनी हेही सांगितलं की केवळ विश्ववसुलाच इथे येण्याची परवानगी आहे आणि जोपर्यंत त्याची इच्छा नसेल तोपर्यंत विश्वावसुने कोणालाही या नीलकंदर गुहेबद्दल सांगू नये.
सबर नगरीच्या हद्दीत प्रवेश केल्यावर विश्ववसूकडे लोक आश्चर्यचकितपणे पहात होते, कारण त्यांना वाटलं की तो मृत्यू पावला आहे. विश्वावसुला पाहून त्याच्या कुटुंबियांना अतिशय आनंद झाला. या जन्मात पुन्हा वडिलांची भेट होण्याची आशा गमावलेली त्याची मुलगी ललिता पुन्हा चैतन्यमय झाली. विश्ववसु परत येताच त्याला पुन्हा राजाच्या गादीवर बसवलं गेलं. आता राज्याचा कार्यभार स्वीकारण्याबरोबरच तो दररोज नीलकंदर गुहेत जाऊन भगवान निलमाधव यांची सेवा करत असे.
हळूहळू नीलकंदर डोंगरावर विश्ववसूच्या रोज जाण्यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला.. राणी आणि राजकन्या ललिता ही तिच्या पित्याच्या वागण्याचं कारण समजून घेऊ इच्छित होती. पण विश्ववसु वचनबद्ध होता, परमेश्वराबद्दल कोणालाही सांगू शकत नव्हता. पण एक दिवस त्याला राहवलं नाही. आणि भगवान निलमाधव यांच्या उपस्थितीबद्दल त्याने त्याचं कुटूंब आणि प्रजेला सर्व काही सांगितलं.. परंतु तरीही तो त्याच्या पहिल्या वचनावर ठाम राहिला की त्याच्याशिवाय इतर कोणालाही देवाचं दर्शन होणार नाही. म्हणून, इतकंच सांगून राजाने कोणालाही नीलकंदर गुहेपर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला नाही. त्यादरम्यान, बरीच वर्षे गेली.
अवंती नगरीत, विष्णूचे परम भक्त महाराज इंद्रद्युम्न सिंहासनावर आरूढ झाले. ते पूर्णपणे त्यांच्या आराध्य दैवताशी एकनिष्ठ होते आणि कोणत्याही प्रकारे श्रीहरींचं थेट दर्शन घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. एका कानापासून दुसऱ्या कानापर्यन्त वार्ता पोचावी तशी आता नीलकंदर गुहेची कहाणी अगदी राजा इंद्रद्युम्नापर्यंतही पोहोचली. जेव्हा त्याला कळलं की श्रीहरी विष्णू संपूर्ण चैतन्यमय स्वरूपात तेथे वास्तव्यास आहेत, तेव्हा त्याला राहवलं नाही. तो निलमाधव यांच्या दर्शनासाठी व्याकूळ झाला होता.
राजा इंद्रद्युम्नाने त्याचा मंत्री विद्यापतीला बोलवून त्याच्याशी सल्लामसलत करण्यास सुरवात केली. विद्यापतीलाही नीलकंदर गुहेची कहाणी माहित होती. त्याला हे माहित होतं की सबरराज विश्वावसुशिवाय इतर कोणालाही तिथला मार्ग माहित नाही; आणि दुसर्या कोणालाही तिथे जायला परवानगी नाही. अशा परिस्थितीत नीलकंदर गुहेपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. म्हणून त्याने इंद्रद्युम्नाला ही इच्छा सोडून देण्याचा सल्ला दिला. पण इंद्रद्युम्नाला हे अमान्य होतं. विद्यापतीला त्याच्या हट्टीपणासमोर हार पत्करावी लागली. अखेरीस राजाला विद्यापतीने सांगितलं की आधी त्याला गुहेजवळ पाठवावं जेणेकरून तो गुहेचा शोध घेऊन परत येऊ शकेल आणि नंतर राजाला देवाचं दर्शन होईल. इंद्रद्युम्नाला हा सल्ला खूप आवडला. आणि त्याने तत्काळ विद्यापतीला उत्कल राज्यात पाठवलं.
उत्कल देशात पोचल्यावर विद्यापती विश्वावसुच्या नगराच्या दिशेने जाऊ लागला. तो सबर नगरात पोहोचणार इतक्यात तो एकटा सापडल्यावर दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. जरी विद्यापति तलवार चालविण्यात कुशल होता तरीही दरोडेखोरांच्या संख्याबळासमोर त्याला पराभव पत्करावा लागला. दरोडेखोरांनी त्याचे सर्व पैसे, शस्त्रास्त्र, दागिने तसेच त्याचा घोडा लुटला आणि त्याला वाईट रीतीने जखमी करून त्याला वाटेत सोडून दिला. आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली असावी असा विचार करून विद्यापति बेशुद्ध पडला. दुसर्या दिवशी त्याला जाग आली तेव्हा तो एका झोपडीत होता.
"नक्कीच भगवान निलमाधव यांची तुमच्यावर कृपा आहे, म्हणून मी योग्य वेळी तिथे पोचले. नाहीतर काय झालं असतं असतं मला माहित नाही!" एका स्त्रीच्या सुमधुर आवाजाने त्याचे कान तृप्त झाले.
"तुम्ही कोण आहात? आणि मी इथे कसा आलो?" वेदनांनी डोकं जड झाल्यामुळे डोकं धरून ठेवत विद्यापतिने विचारलं.
"मी सबरराज विश्वावसुची कन्या ललिता आहे. काल तुम्ही मला नगराबाहेर बेशुद्ध अवस्थेत भेटलात. वैद्यांनी रात्रभर तुमच्यावर उपचार केले, तेव्हाच तुमचे प्राण वाचले. आता तुम्ही आमच्या निवासस्थानी आहात. काळजी करू नका, आपलं जीवन येथे पूर्णपणे सुरक्षित आहे." स्वत:चा परिचय देत ललिता म्हणाली.
ज्या गुहेचा शोध घेत घेत तो अवंतीनगरातून इथे आला होता, ती आत्ता त्याला नक्कीच सापडेल असं विद्यापतिला वाटू लागलं होतं. विश्ववसुच्या मुलीने त्याला वाचवणं हे निश्चितपणे विधिलिखित होतं. अन्यथा तिथे ललिताची उपस्थिती हा केवळ योगायोग असू शकत नाही. मनातल्या मनात त्याने निलमाधव यांना हात जोडून नमस्कार केला.
आता हळूहळू विद्यापती ललिताच्या सेवेमुळे बरा होऊ लागला. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला. विश्ववसूनेही ललिताच्या प्रेमाला मान्यता दिली आणि दोघांनी विवाह केला. विवाहानंतर विद्यापतिही सबर नगरात राहू लागला आणि दररोज नीलकंदरला जाण्याचा मार्ग शोधू लागला. कधीकधी तो गुप्तपणे विश्ववसूचा पाठलाग करी, परंतु जंगलात जरासे दूर गेला की विश्वावसु जणू अदृश्य होई. शेवटी, विद्यापतिला हे चांगलंच समजलं की विश्वावसुच्या मदतीशिवाय निलमाधव यांचं दर्शन होणं अशक्य आहे.
विश्ववसुला पटवणं सोपं नाही, असा विचार करून त्याने आपली प्रिय पत्नी ललिताकडे मदत मागितली. विद्यापतिला अशी आशा होती की जर ललिताने स्वत: विद्यापतीसाठी तिच्या वडिलांकडे विनंती केली तर ते मान्य करतील. सुरुवातीला ललिताला आपल्या पतीची ही इच्छा अयोग्य वाटली. परंतु विद्यापतीने नीलमाधव यांच्या दर्शनाच्या निमित्ताने केलेला आग्रह पाहून तिने स्वतःचं मत बाजूला ठेवत तिच्या पित्याकडे विद्यापतीची इच्छा सांगितली. परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करणं त्याला मान्य नव्हतं. तरीही आपल्या मुलीच्या प्रेमामुळे विश्वावसुदेखील हतबल झाला.
"ठीक आहे. मी फक्त एकदाच तुला नील माधव यांचं दर्शन घडवू शकेन. पण माझी एक अट आहे. त्यानुसार गुहेकडे जाईपर्यंत पूर्ण मार्गावर तुला डोळ्यांवर पट्टी बांधून चालावं लागेल. मी सांगेपर्यंत ती पट्टी काढायची नाही." विश्वावसुला नक्कीच नीलकंदर गुहेचं स्थान गुप्त ठेवायचं आहे हे समजून, विद्यापतीने त्याची अट मान्य केली.
दुसर्या दिवशी सूर्योदयाच्या आधीच दोघेही नीलकंदर गुहेच्या दिशेने निघाले. डोळ्यावर पट्टी बांधल्याने विद्यापती मार्ग पाहू शकत नव्हता, म्हणून त्याने एका पिशवीत मोहरीची बीजं आपल्याबरोबर आणली होती. विश्ववसुची नजर चुकवत तो संपूर्ण रस्त्यावर ती बीजं पसरवत चालला होता. जसजशी नीलकंदर गुहा जवळ येत होती, डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही विद्यापतीला त्याच्या हृदयात एक अलौकिक शांतता त्याला जाणवत होती.
जेव्हा डोळ्यांवरची पट्टी काढली गेली तेव्हा विद्यापतिलाही, तशीच जाणीव झाली जशी नीलमाधव पहिल्यांदा समोर दिसल्यावर विश्ववसूला झाली होती.. पूर्णपणे चैतन्यमय, जिवंत मूर्ती पाहून तो चकित झाला. भगवंताना विद्यापतीने हात जोडून वंदन केलं. आणि श्री हरिंचं हे अनोखं रूप पाहून तोही भावविभोर झाला. विश्ववसूने पूजा संपवून, आपल्या जावयाला डोळ्यावर पट्टी बांधून नीलकंदर येथून परत आणलं.
परत आल्यावर विद्यापती राजा इंद्रद्युम्नाला निलमाधव पाहण्याची कहाणी सांगण्यासाठी व्याकूळ झाला. म्हणून त्याने ललिताचा निरोप घेऊन काही दिवसांसाठी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. जरी त्याने विश्वावसुला गुप्ततेचं वचन दिलं होतं, तरीही इच्छा नसतानाही ते मोडावं लागेल याबद्दल विद्यापतिला थोडंसं वाईट वाटलं.
आता अवंती नगरीत पोचल्यावर, विद्यापतिने इंद्रद्युम्नाला संपूर्ण कथा सांगितली. राजाला इतका आनंद झाला की त्याला क्षणभरही विलंब करायचा नव्हता. त्याने आपल्या सैनिकांना ताबडतोब नीलकंदरकडे कूच करण्याच्या सूचना दिल्या. विद्यापतिला बरोबर घेऊन घोड्यावर बसून राजा त्या जंगलाजवळ पोचला जिथे निलमाधव यांचं वास्तव्य होतं. ज्या ठिकाणी विद्यापतिने मोहरीचे दाणे पसरवले होते त्या रस्त्यावर मोहरीची रोपं आता वाढली होती. विद्यापतिने केलेली ही चतुराई मार्ग ओळखण्यासाठी उपयोगी पडणार होती. राजा आणि सर्व सैनिक त्या वनस्पतींनी बनवलेल्या पदपथाचा मागोवा घेत नीलकंदर गुहेमध्ये पोचले.
पण हे काय? आता ना तिथे दिव्य प्रकाश होता, ना तुळशीचा आणि चंदनाचा सुगंध. एखाद्या सामान्य गुहेप्रमाणेच ही गुहा ओसाड होती. हे पाहून राजा फार दु:खी झाला आणि भगवान निलमाधव यांच्या इच्छेविरूद्ध त्यांच्या दर्शनाची लालसा धरल्यामुळे तो स्वत:चाच तिरस्कार करु लागला. जमिनीवर लोळण घेत तो लहान मुलासारखा रडू लागला आणि आपल्या मूर्खपणाला दोष देत राहिला.
"हे त्रैलोक्याच्या स्वामी, आपली आज्ञा नसतानाही मी आपलं दर्शन घेण्याचा हट्ट धरला आणि धाडस केलं. या कार्यात मी सबरराज विश्ववसूलाही फसवलं. भगवान, मला जगण्याचा अधिकार नाही. हक्क नाही.” राजा आता वेड्यासारखं डोकं आपटून घेऊ लागला.
त्याचवेळी विश्वावसुसुद्धा नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी तिथे पोहोचला. राजा आणि इतर नगरसेवकांसह गुहेच्या आत असलेल्या विद्यापतिला पाहून त्याला संपूर्ण घटनेची कल्पना आली. तोही राजाप्रमाणेच आता भगवान निलमाधव यांच्या निघून जाण्यामुळे अतिशय दु:खी झाला.
त्याचवेळी घनघोर गर्जनेसह आकाशवाणी झाली.
“मी माझं आगमन व निर्गमनाचा वेळ मी स्वतः ठरवतो. नीलकंदर मधील माझं अस्तित्व आणि माझं येथून अदृश्य होणं हेदेखील मी ठरवतो. विश्वावसु आणि इंद्रद्युम्न, तुम्ही आपापल्या राज्यात परत जा, योग्य वेळी मी स्वतःच तुम्हाला मार्गदर्शन करेन."
ही आकाशवाणी ऐकल्यानंतर आता कोणाच्याही मनात काहीही शंका नव्हती. राजा इंद्रद्युम्नासमवेत अवंती नगरात परत जात असताना विद्यापति ललिताला आपल्याबरोबर घेऊन गेला. त्याचवेळी आपली मुलगी आणि जावई यांना निरोप दिल्यानंतर विश्वावसुने आपल्या राज्यकारभाराकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. श्री हरी विष्णूंच्या आदेशानुसार सर्वजण आपापल्या राज्यात परत गेले आणि पुढील काळाची वाट पाहत बसले.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة