सुहृदां हितकामानां न करोतीह यो वचः ।
स कूर्म इव दुर्बुद्धिः काष्ठाभ्द्रष्टों विनश्यति ॥
“जो आपल्या सहृदय हितचिंतकांचा सल्ला ऐकत नाही, तो स्वतःच्या मूर्खपणामुळे खाली पडणाऱ्या त्या कासवासारखा नष्ट होतो”
एका तलावात कम्बुग्रीव नावाचं एक कासव रहात होतं. संकट आणि विकट अशा नावाचे दोन हंस त्याचे खास मित्र होते. खूप वर्षांत पाउस न पडल्यामुळे एकदा तो तलाव हळूहळू सुकायला लागला. एके दिवशी याच विषयावर हे तिघे बोलत होते. कासव म्हणालं “मित्रांनो! पाण्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. जीव वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधायला हवा!”
हंस म्हणाले “इथून थोड्याच अंतरावर एक मोठा तलाव आहे. त्यात पुष्कळ पाणी आहे. आपल्याला तिथेच जायला हवं!”
यावर कासव म्हणालं “तुम्ही दोघं जाऊन कुठून तरी एक लाकडाची काठी घेऊन या. ती काठी तुम्ही दोन्ही बाजूंनी तुमच्या पंजांमध्ये धरून उडायचं. आणि मी ती काठी दातांनी धरून तिला लटकेन!”
त्यावर हंस म्हणाले “चालेल, आम्ही तू म्हणतोस तसं करू. पण तू कुठल्याही परीस्थितीत तोंड उघडू नको. तोंड उघडलंस तर तू खाली पडून मरशील!”
ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाने दातांनी धरलेली काठी घेऊन उडत निघाले. रस्त्यात त्यांना एक गाव लागलं. हा प्रकार बघून गावकरी चकित झाले आणि म्हणू लागले “अरेच्या! बघा बघा हे पक्षी चक्रासारखं काहीतरी घेऊन उडत चाललेत!”
हे ऐकून कासवाला राहवलं नाही आणि ते म्हणालं “चक्रासारखं काहीतरी नाही, हा मी आहे, कम्बुग्रीव!”
हे बोलताना साहजिकच कासवाचं तोंड उघडलं आणि इतक्या उंचावरून खाली पडल्यामुळे ते मेलं.
म्हणूनच असं म्हणतात की आपल्या हितचिंतकांचा सल्ला ऐकावा.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة